भिवंडी- शरद पवार गटाचे सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर केल्याने भिवंडी मतदारसंघाबाबत तिढा सुटला आहे. परंतु महाविकास आघाडीने भिवंडी लोकसभेची जागा राष्ट्रवादीला सोडल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांनी बाळ्यामामांना कोणतीही मदत न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर गरज पडल्यास कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर बंडखोरी करण्याचा इशारादेखील त्यांनी दिला आहे.
भिवंडी लोकसभा क्षेत्रातील ठाणे जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी एकत्र येत काल वाटिका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यानंतर ठाणे जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. यावेळी मित्र पक्ष म्हणून बाळ्यामामांना कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही, असा ठराव समंत झाला. तसेच मामांनी प्रचारासाठी काँग्रेसचे झेंडे, चिन्ह वापरू नये असेही यावेळी काँग्रेस कार्यकारिणीने प्रसार माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या कोणत्याही बैठकीला, सभेला जाऊ नये, असेही सांगण्यात आले. यावेळी माजी खासदार सुरेश टावरे, रशिद ताहीर मोमीन, पंकज गायकवाड, जावेद फारुकी, विजय पाटील, तारिक फारुकी आदींसह ठाणे जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.