छत्रपती संभाजीनगर – यंदा पावसाने संपूर्ण राज्यात पाठ फिरवल्याने पाणीटंचाईची झळ सर्वांनाच जाणवत आहे. मात्र मराठवाड्यातील परिस्थिती अत्यंत गंभीर दिसत आहे. या भागातील जनता पाण्यासाठी वणवण फिरत आहे. तब्बल ७५० जलसिंचन प्रकल्पात फक्त १२.९२ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.गेल्यावर्षी याचकाळात हा पाणीसाठा ३४.२८ टक्के इतका होता.
विशेष करून मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील पाणीस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. या जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत केवळ २.४० क्युबिक मीटर पाणीसाठा उपलब्ध आहे. म्हणजेच एकूण क्षमतेच्या तुलनेत हा पाणीसाठा १.४२ टक्के इतका आहे. जलसिंचन विभागाने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, हिंगोली,
धारशिव,लातूर आणि परभणी आदी जिल्ह्यांतील ७५० प्रकल्पांची पाणी परिस्थिती जाहीर केली आहे. सध्या मार्च महिना सुरू असतानाच एवढी तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. तर मग पुढील एप्रिल व मे महिन्यात काय परिस्थिती असेल याची कल्पनाच करणे अवघड आहे. याठिकाणी अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. या टँकरवरही लोकांची झुंबड दिसून येत आहे. कुठूनही पाणी मिळविणे हे जणू सर्वांचे नित्य कामच बनले आहे.