मविआत जागावाटपावरून कोणताही तिढा नाही! संजय राऊत यांचा दावा

मुंबई- ठाकरे गटाने उमेदवारांची यादी जाहीर केली म्हणजे महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून तिढा आहे असे होत नाही. महाविकास आघाडीत जागावाटपावरून कोणताही तिढा नाही, असा दावा आज ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊतांनी सांगितले की, आज सकाळी ठाकरे गटाच्या १७ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. जागावाटपाबाबत महाविकास आघाडीमध्ये कोणताही तिढा नाही. रामटेक मतदारसंघातून चार पेक्षा जास्त वेळा आमचा उमेदवार निवडून आला आहे, तरी देखील आम्ही जागा चर्चेतून काँग्रेसला सोडली आहे. तिथून काँग्रेसने उमेदवार जाहीर केला त्यावर ती आम्ही काही भाष्य केले नाही, तो प्रश्न चर्चेतून सुटला होता. त्या बदल्यात आम्ही मुंबईतील एक जागा लढवणार असे आम्ही स्पष्ट केले होते. मविआमधील झालेले निर्णय आम्ही जाहीर करत आहोत. मविआत काहीच वाद नाही, आज जी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे त्यातून हे स्पष्ट झालेच आहे. शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली म्हणजे मविआत जागा वाटपावरून कोणताही तिढा आहे, असे आम्हाला वाटत नाही. काँग्रेसची यादी आली तेव्हा आम्ही कोणताही आक्षेप घेतला नााही. कोल्हापूर मतदारसंघातून शाहू महाराज काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहेत, हे समजल्यावर आम्ही वाद न करता ती जागा काँग्रेससाठी सोडली. हातकणंगले मतदारसंघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्याशी चर्चा सुरू आहे. त्या संदर्भात उद्धव ठाकरे निर्णय घेतील. प्रकाश आंबेडकरांसाठी अजून आम्ही थांबलो आहोत, त्यांना ५ जागांचा प्रस्ताव आमच्याकडून देण्यात आला आहे. आंबेडकर आमच्या सोबत येतील याची आम्हाला खात्री आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top