मुंबई- मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेला तापमानाचा पारा पुढील तीन दिवस कायम राहणार आहे. येत्या शनिवार ,रविवार आणि सोमवार या दिवसांत उष्णतेची लाट येणार असून तापमानाचा पारा ३७ अंशांच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तविला आहे.या तीन दिवसांत मुंबईकरांनी दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे असे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईतील तापमानात वाढ होत असल्याने पालिकेच्या केईएम, नायर,सायन आणि कूपर रूग्णालयात कोल्डरूम तयार करण्यात करण्यात करण्यात आल्या आहेत.मागील तीन दिवसांपासुन मुंबईतील तापमान थोडेसे घसरले आहे.मात्र आता पुढील तीन दिवसांत ते पुन्हा चढे राहणार आहे.जेव्हा हवामान केंद्राचे कमाल तापमान मैदानी भागात किमान ४०,किनारपट्टी भागात ३७ आणि डोंगराळ प्रदेशात ३० अंशांपर्यंत पोहचते,तेव्हा उष्णतेची लाट आली असे म्हटले जाते.मुंबई ही किनारपट्टी भागात येत असल्याने संभाव्य ३७ अंश तापमान हे उष्णता लाटेच्या श्रेणीत मोडते.त्यामुळे पुढील तीन दिवस मुंबईकरांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.