मुंबई
मुंबई, ठाण्यासह कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा आज हवामान खात्याने दिला. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि ठाण्यासह कोकणात आजपासून पुढचे तीन दिवस उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. यामुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमध्ये तापमान वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे आजपासून पुढच्या तीन दिवसांत मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यांना कडक उन्हाच्या झळांना सामोरे जावे लागेल. उत्तर कोकणात २८ आणि २९ एप्रिल रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानाचा पारा ४० ते ४२ अंशावर जाण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता आहे. बीड, धाराशीव, लातूरमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे.