मुंबई- मुंबई वगळता संपूर्ण राज्यामध्ये १ मार्च ते १२ एप्रिल या कालावधीमध्ये म्हणजे ४२ दिवसांत उष्माघाताच्या ७७ रुग्णांची नोंद झाल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.सध्या ठाणे, नागपूर,चंद्रपूर आणि राज्यातील इतर आठ जिल्ह्यातील तापमान हे ४० डिग्री सेल्सिअसच्या पुढे गेलेले नाही.आतापर्यंत जे ७७ रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ३६ उष्माघाताचे रुग्ण हे ४ एप्रिल ते १२ एप्रिल या आठ दिवसांच्या कालावधीमध्ये आढळले आहेत.हे राज्यात वाढत्या तापमानाचा इशारा देत आहे.
मागच्यावर्षी याच कालावधीमध्ये ३७३ उष्णाघाताचे रुग्ण आढळले होते. यावर्षीची रुग्णसंख्या ही मागच्या वर्षीच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत कमी आहे.यावर्षी बुलडाण्यामध्ये उष्माघाताच्या १२ रुग्णांची नोंद झाली आहे.सिंधुदुर्गात
९ रुग्ण, वर्ध्यात ७ रुग्ण, नाशिकमध्ये ६ रुग्ण, कोल्हापूरात ५ रुग्ण आणि पुण्यात ५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ठाणे जिल्ह्यामध्ये मार्चपासून ३ रुग्ण आढळले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाचे सहसंचालक डॉ.कैलाश बाविस्कर यांनी सांगितले की, ‘वाढत्या तापमानाचा लोकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे निर्जलीकरणापासून ते उष्माघातापर्यंत अनेक आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत.’ राज्यातील नागरिकांसाठी तसेच वैद्यकीय संस्थांसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. राज्यातील अनेक भागांचे तापमान हे ४० अंशाच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे राज्यात यावर्षी उष्माघाताने कोणाचाही मृत्यू झालेला नाही.वाढते तापमान लक्षात घेता मुंबईत पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १६ रुग्णालयांमध्ये थंड खोलींची व्यवस्था केली आहे. ज्यामध्ये दोन बेड्स असतील.पालिकेच्या १०३ दवाखान्यांमध्ये वॉटर कुलर उपलब्ध आहेत.राज्याच्या आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.