पुणे – इतरांचे ऐकण्याची शक्ती जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात महत्त्वाची आहे. परंतु आपल्या समाजाची समस्या ही आहे की आपण इतरांचे ऐकत नाही तर आपण फक्त आपलेच ऐकतो. त्यामुळे युवकांनी इतरांचे ऐकायला शिकले पाहीजे, असा मोलाचा सल्ला भारताचे सरन्यायाधीश डॉ.डी.वाय.चंद्रचूड यांनी युवकांना दिला.
पुण्यातील सिंबायोसिस इंटरनॅशनल (डीम्ड) विद्यापीठाच्या 20 व्या दीक्षांत समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ.शां.ब.मुजुमदार, विद्यापीठाच्या प्र-कुलपती डॉ.विद्या येरवडेकर, विद्यापीठाचे प्रो-होस्ट डॉ.राजीव येरवडेकर, कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. चंद्रचुड यांनी २८ मिनिटांच्या भाषणात विद्यार्थ्यांनी अपयशाने खचून न जाता त्यातून नवीन काहीतरी शिकण्याची उर्मी ठेवण्याचा सल्ला देत विद्यार्थ्यांनी त्यांचे जीवन कसे जगावे याविषयी बहूमुल्य मार्गदर्शन केले. डॉ. चंद्रचुड म्हणाले, एक न्यायाधीश आजूबाजूच्या वादांच्या त्रासातून सर्वात जास्त शिकतो, एक डॉक्टर सर्वात जास्त सराव करणारा बेडसाइड शिष्टाचार शिकतो, एक पालक आपल्या मुलांच्या तक्रारी ऐकून सर्वात जास्त शिकतो, एक शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांमधून सर्वात जास्त शिकतो आणि तुम्ही (विद्यार्थी) जीवनात मोठे झाल्यावर लोक तुमच्यासमोर सर्वात जास्त प्रश्न निर्माण करतील त्यातून तुम्ही शिकाल. युवकांनी इतरांचे ऐकण्याचे आणि स्वतःचे इको चेंबर तोडण्याचे धैर्य ठेवणे गरजेचे असल्याचेदेखील डॉ. चंद्रचूड यांनी सांगितले.