*आव्हान देणारी याचिका
हायकोर्टाने फेटाळली
मुंबई – काही दिवसांपूर्वी राजकीय रणकंदन सुरू झाल्याने रखडलेली मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अखेर नवीन प्रक्रियेनुसार वेळेवर घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विद्यापीठाच्या निवडणूक प्रक्रियेला विरोध करणारी आव्हान याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली. त्याचप्रमाणे निवडणूक प्रक्रिया कायद्यानुसारच राबविली जात असल्याचा विद्यापीठाचा दावा न्यायालयाने ग्राह्य मानला.
मुंबई विद्यापीठाच्या पदवीधर सिनेट मतदारसंघाच्या निवडणुकीवरून काही दिवसांपूर्वी राजकीय वाद निर्माण झाला होता.त्यानंतर निवडणुकीला स्थगिती देण्यात आली होती.तसेच मुंबई विद्यापीठाकडून सिनेट निवडणुकीसाठी नव्याने मतदार नोंदणीची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. विद्यापीठाच्या या निवडणुक प्रक्रियेला आणि स्थगितीला आव्हान देणारी याचिका अॅड. सागर देवरे यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. नव्याने सुरू केलेली निवडणूक प्रक्रिया थांबवून सिनेट निवडणुकीसाठी ९ ऑगस्टच्या अंतिम यादीचा वापर करण्याचे निर्देश विद्यापीठाला द्यावेत, अशी या याचिकेत देवरे यांनी केली होती. ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे. विद्यापीठाच्यावतीने ज्येष्ठ वकील अॅड.अनिल साखरे आणि अॅड. युवराज नरवनकर यांनी युक्तिवाद केला,तर याचिकाकर्त्यातर्फे अॅड.राजकुमार अवस्थी यांनी बाजू मांडली.