राजापूर
रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूरच्या गंगेचं सहा महिन्यांनी पुन्हा एकदा आगमन झालं आहे. मुख्य काशिकुंडासह चौदाही कुंडांमध्ये गंगेचं पाणी प्रवाहित झालं आहे. २०१३पूर्वी गंगा साधारण तीन वर्षांनी यायची आणि सर्व कुंडं कोरडी व्हायची. त्यानंतरच्या काळात मात्र जवळपास दर वर्षी गंगा अवतीर्ण होत असून, सर्व कुंडांमधलं पाणी जात नाही. आता फाल्गुन पौर्णिमेच्या दिवशी सकाळी (२४ मार्च) गंगेचं आगमन झालं असल्याची माहिती राजापूरची गंगा देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत घुगरे यांनी ‘आकाशवाणी’शी बोलताना दिली. गंगा आल्यानंतर देवस्थानात धार्मिक कार्यक्रम केले जातात. तसंच, दूरदूरचे भाविकही गंगास्नानाची पर्वणी साधतात. भूगर्भातली विशिष्ट रचना, हालचाली किंवा सायफनसारख्या यंत्रणेमुळे निसर्गाचा हा आविष्कार घडत असावा, असं काही भूगर्भशास्त्रज्ञांचं मत आहे.