लखनौ
अयोध्येत प्रभू श्रीराम विराजमान झाल्यानंतरची ही पहिलीच रामनवमी आहे. त्यामुळे यंदाच्या रामनवमी सोहळ्याला महत्त्व प्राप्त झाले असून सध्या अयोध्येत राम नवमीनिमित्त जोरदार तयारी सुरू आहे. या सोहळ्या दिवशी राम मंदिर आणि आजूबाजूच्या परिसरात रांगोळ्यांचा सडा, रंगबरिरंगी फुलांची सजावट, डोळे दिपवून टाकेल अशी विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. या दिवशी लाखो भाविक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी येणार आहेत.
या दिवशी प्रभू श्रीरामांच्या कपाळावर रामनवमीच्या अभिजीत मुहूर्तावर सूर्याची किरणे पडतील. या सूर्यतिलकाची यशस्वी चाचणी काल पार पडली. काल दुपारी १२ वाजता शास्त्रज्ञांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात आल्याचे रामजन्मभूमी ट्रस्टने सांगितले. १७ एप्रिल रोजी रामनवमीनिमित्त दुपारी ठीक १२ वाजता रामलल्लाचे सूर्यतिलक करण्यात येणार आहे. या दिवशी अयोध्येत तब्बल ५० लाख भाविक येण्याची शक्यता आहे. भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाची जय्यत तयारी सुरू आहे. भाविकांच्या निवासाची आणि भोजनाची खास सुविधा असेल. भक्तांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी करण्यात येणार आहे. परदेशी भाविकांना १४ दिवस क्वारंटाईन करण्यात येणार आहे. कायदा आणि सुव्यवस्थेसाठी पोलीस, लष्करी जवानांची पथके तैनात असतील. शरयू नदीत सहा फायबर बोट तैनात असतील. दरम्यान, जगभरातील रामभक्तांसाठी यंदाची रामनवमी एक विलक्षण पर्वणी असणार आहे. मर्यादा, संस्कती, परंपरा, सात्विकता, संयम आणि शौर्याचा अवतार असलेल्या प्रभू रामाच्या जन्माचा सोहळा अयोध्येत मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा होणार आहे.