मुंबई- भारतीय लष्कराच्या ‘अग्निवीर’ भरतीसाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक असलेले उमेदवार भारतीय लष्कराच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या इंडियन आर्मी अग्निवीर भर्ती २०२४ चा अर्ज भरू शकतील. तरी इच्छुक तरुणांनी २२ मार्चपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी,अशी माहिती संचालक (भरती) कर्नल विक्रम सिंग यांनी दिली.
अर्ज केल्यानंतर उमेदवारांना एप्रिलमध्ये लेखी परीक्षेसाठी बोलावले जाईल. निवडलेले उमेदवार पुढे शारीरिक चाचणीत बसतील. १७.५ ते २१ वर्षे वयोगटातील उमेदवारांना अग्निवीर होण्यासाठी अर्ज करता येईल. यामधील जनरल ड्युटी अग्निवीरसाठी अर्जदार १० वी उत्तीर्ण तर अग्नीवीर ट्रेडमैनसाठी ८ वी उत्तीर्ण अशी पात्रता अट आहे. उमेदवाराची निवड गुणवत्तेवर आधारित केली जाणार आहे. ही भरती मुंबई शहर ,मुंबई उपनगर ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार या आठ जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असणार आहे. ऑनलाइन अर्ज केल्यानंतर प्रवेशपत्रे त्यांच्या ईमेल आयडीवर पाठवली जातील. त्यानंतर राज्यातील विविध परीक्षा केंद्रावर ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल.
२२ एप्रिलपासून ही ऑनलाइन परीक्षा घेतली जाईल. गुणवत्ता यादी संकेतस्थळावर घोषित केली जाईल. त्यानंतर भरतीसाठी बोलवले जाईल.