नवी मुंबई – एका १५ वर्षांच्या शाळकरी मुलाने धावत्या लोकल ट्रेनमधून वाशी खाडीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. अरुण अजित सिंह (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. काल बुधवारी सायंकाळी त्याचा मृतदेह वाशी खाडीत सापडला. त्याच्या आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झाले नाही.
अरुण सिंह हा वाशीतील जुहू गावात आपले आईवडील आणि भावंडांसह
राहत होता.तो वाशीतील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.मंगळवारी सायंकाळी तो आपल्या घराबाहेर पडला होता. रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्याच्या आई-वडिलांनी वाशी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी शोध सुरू केला होता. सीसीटीव्हीचा तपास केला असता अरुण वाशी येथून लोकलने मानखुर्द येथे गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तो मानखुर्द रेल्वे स्थानकात उतरून पुन्हा वाशीच्या दिशेने येत असल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले.मात्र,तो वाशी स्थानकात उतरताना दिसला नाही.
दरम्यान,वाशी खाडी पुलावरून लोकलमधील एका मुलाने उडी मारल्याची माहिती काही प्रवाशांनी रेल्वे पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिस शोध घेत असताना बुधवारी संध्याकाळी एका मुलाचा मृतदेह खाडीत तरंगताना आढळून आला.अग्निशमन दलाच्या मदतीने तो बाहेर काढून रुग्णालयात पाठवण्यात आला.हा मृतदेह अरुण सिंह याचाच असल्याचे स्पष्ट झाले. अरुणने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याबाबत त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांकडून पोलिस माहिती घेत आहेत.तसेच
वाशीतील जुहू गावात एकाच आठवड्यात झालेली ही तिसरी आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.