मुंबई – भारदस्त आवाजाने अवघा महाराष्ट्र दणाणून सोडणाऱ्या दिवंगत लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या पत्नी वत्सला विठ्ठल उमप यांचे अल्पशा आजाराने गुरुवारी संध्याकाळी निधन झाले. आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
महाराष्ट्रातील लोककला ‘जांभूळ आख्यान’, ‘खंडोबाचं लगीन’ सारख्या लोकनाट्यांच्या रूपाने जगभर पोहोचवणाऱ्या शाहीर उमप यांनी, महाराष्ट्रातील लोकसंगीत रुजवण्या व वाढवण्यासाठी अथक परिश्रम घेतले. शाहीर उमप आपल्या कामानिमित्त बाहेर असले की त्यांच्या पत्नी वत्सलाबाई त्यांचा कणा बनून कुटुंब सावरायच्या.
कुटुंबाच्या चरितार्थासाठी त्यांनी एकेकाळी नायगाव येथील १० बाय १० च्या खोलीत खानावळही चालवली होती. तसेच वेळ पडल्यावर भाजीपालाही विकला होता. योगायोगाने त्या दोघा पतीपत्नींनी जन्मतारीखही एकाच होती. रंगभूमीची आयुष्यभर सेवा करणाऱ्या शाहीर उमप यांनी नोव्हेंबर २०१० मध्ये नागपुरात रंगमंचावरचा अखेरचा श्वास घेतला होता.