मुंबई :
विदर्भात २दिवसांपूर्वी अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता आणखी दोन ते तीन दिवस विदर्भात अवकाळी पावसाचे सावट कायम आहे, तर काही जिल्ह्यांत गारपिटीचा इशाराही हवामान खात्याने दिला आहे. राज्यातील उर्वरित भागांत तापमानाचा पार वाढत आहे. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीच्या पुढे गेले आहे. मात्र विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत अवकाळी पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.
हवामान खात्याने उद्या वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यांना वादळी पावसासह गारपिटीचा यलो अलर्ट देण्यात आला आहे, तर नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांना वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच विदर्भात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहतील.