सातारा
सातारा जिल्हा परिषदेकडून डोंगरदऱ्यातील व दुर्गम भागातील नैसर्गिक स्रोत असणाऱ्या झऱ्यांचे संवर्धन करण्यात येणार आहे. दऱ्याखोऱ्यातील दुर्गम भागांत पाणी सहज उपलब्ध होत असल्याने या झऱ्यांकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झाले होते, मात्र दुष्काळी परिस्थितीत आणि टंचाईच्या काळात या झऱ्यांचे महत्त्व ओळखून प्रशासनाने झऱ्यांचे नवनिर्माण करून संवर्धन करण्याचे ठरविले आहे. यामुळे दुर्गम भागातील १६३ झऱ्यांना नवसंजीवनी मिळणार आहे.यासाठी ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोगातून निधीही उपलब्ध केला आहे.
झरे हे पाण्याचे नैसर्गिक स्रोत असून त्यांचे संवर्धन ही काळाची गरज आहे. पूर्वी वर्षानुवर्षे दुर्गम डोंगराळ वस्तीतील लोक, गुरे झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून असायचे. वनस्पती आणि प्राण्यांच्या दुर्मिळ प्रजातीदेखील झऱ्यांनीच टिकवून ठेवल्या आहेत. वाढते तापमान, पावसाचे कमी जास्त प्रमाण, पाण्याची टंचाई याचा खूप मोठा परिणाम झऱ्यांवर झाला नाही, त्यामुळे डोंगराळ भागात वस्ती व नैसर्गिक संपदा टिकवून ठेवण्यास मोठ्या प्रमाणात मदत झाली आहे. नैसर्गिक साखळी जिवंत ठेवण्याचे काम झऱ्यांनी केले, मात्र झऱ्यांचे अस्तित्व संपल्याने सातत्याने दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवत असते. या ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. कधीकधी टँकर वेळेत पोहोचत नाही. त्यामुळे पाण्याची टंचाई सातत्याने जाणवत असते. यावर पर्याय म्हणून सातारा जिल्हा परिषदेने लोकसहभागातून झरे संवर्धनाचे काम सुरू केले आहे.