भाईंदर – सूर्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे काम अद्याप अपूर्ण अवस्थेत आहे. त्यामुळे आता मीरा-भाईंदरच्या जनतेला मे ऐवजी नोव्हेंबर महिन्यात पाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिणामी पाण्यासाठी आणखी सात महिने प्रतिक्षा करावी लागणार आहे.
एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता हनुमंत सोनवणे यांनी सांगितले की, सूर्या प्रकल्पातून वसई-विरार आणि मीरा-भाईंदर महापालिकेला पाणीपुरवठा करण्यासाठी ४ पंपांची आवश्यकता आहे. त्यासाठी १३२ केव्ही क्षमतेचा वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. हा वीजपुरवठा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीने केबल टाकण्याचे आणि वीज खांब बसविण्याचे काम सुरू केले आहे. मात्र हे काम पूर्ण होण्यासाठी नोव्हेंबर महिना उजाडणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास पुढील सात महिने विलंब होणार आहे.या प्रकल्पातून मीरा-भाईंदर शहराला २१८ एमएलडी पाणी मिळणार आहे.त्यामुळे २०५५ पर्यंतचा शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे.