मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात उद्या १२ राज्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशातील ८८ जागांसाठी मतदान होणार आहे. याआधी या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान होणार होते, मात्र मध्य प्रदेशातील बैतुल जागेवर बसपाच्या उमेदवाराचा मृत्यू झाल्याने आता या जागेसाठी ७ मे रोजी मतदान होणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात १,१९८ उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये १,०९७ पुरुष आणि १०० महिला उमेदवार आहेत, तर एक उमेदवार तृतीयपंथी आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मने (एडीआर) १,१९२ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीचा अहवाल तयार केला. त्यापैकी २१ टक्के म्हणजेच २५० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर ३९० म्हणजेच ३३ टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्यांच्याकडे १ कोटी किंवा त्याहून अधिकची संपत्ती आहे. ६ उमेदवारांनी त्यांची संपत्ती शून्य घोषित केली आहे, तर तिघांची मालमत्ता ५०० ते १००० रुपये इतकीच आहे.
२०१९ साली भाजपाने या जागांपैकी सर्वाधिक ५० जागा जिंकल्या होत्या आणि एनडीए मित्रपक्षांनी ८ जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला २१ जागा मिळाल्या होत्या. तर, अन्य पक्षांना ९ जागा मिळाल्या होत्या.