Mumbai Crime : मुंबईतील वांद्रे (पूर्व) येथील खेरवाडी परिसरात घडलेल्या अभिनव कुमार हत्याकांडाचा गुंता सोडवण्यात मुंबई पोलिसांना मोठे यश आले आहे. अत्यंत आव्हानात्मक असलेल्या या प्रकरणाचा अवघ्या ६० तासांत छडा लावत पोलिसांनी मुख्य आरोपी निरज कुमार विलास चौधरी (३१) याला कोलकाता विमानतळावरून बेड्या ठोकल्या आहेत. सूडाच्या भावनेतून आणि वैयक्तिक रागातून हे निर्घृण हत्याकांड घडल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, पोलिसांनी तांत्रिक कौशल्याच्या जोरावर या गुन्ह्याचा पर्दाफाश केला आहे.
हत्येमागील कारण आणि सूडाचा प्रवास-
१३ एप्रिल रोजी खेरवाडीतील कल्पतरू स्पार्कल या उच्चभ्रू वस्तीच्या परिसरात अभिनव कुमार या तरुणावर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्लेखोरांनी अभिनवच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्याची निर्घृण हत्या केली होती. या घटनेने संपूर्ण वांद्रे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस तपासात या हत्येमागे ‘प्रेमप्रकरणाचा’ अँगल समोर आला आहे. मृत अभिनव कुमार हा एका महिलेच्या संपर्कात होता, ज्या महिलेचा विवाह आरोपी निरज चौधरी याच्याशी निश्चित झाला होता. मात्र, काही कारणास्तव त्या महिलेने निरजसोबत लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला. आपले ठरलेले लग्न मोडण्यास अभिनव कुमारच जबाबदार आहे, असा पक्का समज निरजने करून घेतला होता. याच रागाच्या भरात त्याने अभिनवचा काटा काढण्याचे ठरवले आणि आपल्या साथीदारांच्या मदतीने हा कट अंमलात आणला.
पोलिसांची गतीमान तपासाची चक्रे-
गुन्हा केल्यानंतर आरोपी निरज हा मुंबईतून पसार झाला होता. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने अतिशय सावधगिरीने प्रवास केला. त्याने आपला ठावठिकाणा लपवण्यासाठी रेल्वेने विविध शहरांचा प्रवास केला. मात्र, मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि स्थानिक पोलिसांनी तांत्रिक देखरेख (Technical Surveillance) आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा माग काढण्यास सुरुवात केली. आरोपीचे लोकेशन वारंवार बदलत असतानाही पोलिसांनी त्याचा पिच्छा सोडला नाही. आरोपीला पकडण्यासाठी मुंबई पोलिसांनी तात्काळ नागपूर आणि कोलकाता येथे आपली विशेष पथके विमानाने रवाना केली.
कोलकाता विमानतळावरील नाट्यमय अटक-
आरोपी निरज प्रथम रेल्वेने हावडा स्थानकावर पोहोचला होता. मात्र, पोलीस आपल्या मागावर असल्याची चाहूल लागताच त्याने तिथूनही पलायन करण्याचा प्रयत्न केला. तो कोलकात्यावरून अन्यत्र पळून जाण्याच्या तयारीत असतानाच, मुंबई पोलिसांच्या पथकाने स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कोलकाता विमानतळावर सापळा रचला. अत्यंत थरारक पद्धतीने पोलिसांनी त्याला धावपट्टी गाठण्यापूर्वीच ताब्यात घेतले.










