Operation Tiger : महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत मोठी आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा हादरा देणारे एकनाथ शिंदे यांचे ‘ऑपरेशन टायगर’ पूर्णपणे यशस्वी झाले असून, बंडखोर ६ खासदारांच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा येत्या शनिवारी संसदेकडून केली जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवसेनेच्या आगामी वर्धापनदिनाचे (२० जून) औचित्य साधून या राजकीय भूकंपाची अधिकृत घोषणा केली जाईल, अशी रणनीती शिंदे यांच्या शिवसेनेने आखली आहे.
“ठाकरेंची शिवसेना काँग्रेसमध्ये विलीन होणार”; पत्रातील धक्कादायक दावा
प्रसिद्ध वृत्तवाहिनी ‘एबीपी न्यूज’च्या राजकीय संपादक मेघा प्रसाद यांनी या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचे तपशील जाहीर केले आहेत. त्यांच्या माहितीनुसार, ठाकरे गटापासून दूर गेलेल्या या ६ खासदारांनी त्यांच्या स्वाक्षऱ्यांचे अधिकृत पत्र गेल्या ४८ तासांपूर्वीच लोकसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केले आहे. या पत्रात खासदारांनी बंडखोरीचे एक अत्यंत धक्कादायक कारण नमूद केले आहे. “उद्धव ठाकरे हे आगामी काळात आपल्या मूळ शिवसेनेचे काँग्रेस पक्षात विलीनीकरण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच भीतीपोटी आम्ही हा निर्णय घेत आहोत,” असा दावा या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना दिलेल्या पत्रात केला आहे.
या कायदेशीर प्रक्रियेची घोषणा तातडीने न करता, शिवसेनेच्या वर्धापनदिना दिवशी म्हणजेच २० जून रोजी करण्याचे निश्चित झाले आहे. शनिवारी संसदेकडून एक विशेष परिपत्रक (बुलेटिन) जारी केले जाण्याची शक्यता असून, त्यामध्ये या ६ खासदारांच्या नव्या गटाचे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत अधिकृत विलीनीकरण झाल्याचे जाहीर केले जाईल. या प्रक्रियेदरम्यान लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला हे नियमानुसार ठाकरे गटाच्या नेत्यांना बोलावून चर्चा करू शकतात, परंतु यावर अंतिम निर्णय घेण्याचे सर्व कायदेशीर अधिकार लोकसभा अध्यक्षांचेच असतील, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
व्हिप धुडकावला; ठाकरे गटाला ४ वर्षांनंतर पुन्हा मोठा धक्का
२०२२ मधील एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर, बरोबर ४ वर्षांनी उद्धव ठाकरे यांना लोकसभेत हा दुसरा सर्वात मोठा धक्का बसला आहे. गुरुवारी दिल्लीत बोलावण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या संसदीय दलाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा फुटीचा कौल स्पष्ट झाला. पक्षाने बजावलेला अधिकृत ‘व्हिप’ (पक्षप्रतोदांचा आदेश) धाब्यावर बसवून ६ खासदार या बैठकीला गैरहजर राहिले. या बैठकीला केवळ संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चारच खासदार उपस्थित होते. या शिस्तभंगाची गंभीर दखल घेत ठाकरे गटाने अनुपस्थित खासदारांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून, ७ दिवसांत समाधानकारक उत्तर न दिल्यास अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
ठाकरे गटाचा पलटवार: राजीनाम्याचे आव्हान आणि ‘ऑपरेशन तुडवा’चा इशारा
या मोठ्या बंडखोरीनंतर ठाकरे गट कमालीचा आक्रमक झाला असून खासदार संजय राऊत यांनी बंडखोरांवर अत्यंत शेलक्या शब्दांत टीका केली आहे. बंडखोर खासदारांना थेट आव्हान देत राऊत म्हणाले, “जर तुमच्यात हिंमत असेल आणि तुम्ही आमच्या पक्षाच्या चिन्हावर व उद्धव ठाकरेंच्या नावावर निवडून आला असाल, तर तात्काळ आपल्या खासदारकीचा राजीनामा द्या आणि पुन्हा जनतेच्या दारात जाऊन निवडून येऊन दाखवा.”
या फुटीचा प्रतिवाद करण्यासाठी आता ठाकरे गटानेही आक्रमक व्यूहरचना आखली आहे. शिंदेंच्या’ऑपरेशन टायगर’ला उत्तर म्हणून आता उद्धव ठाकरेंची शिवसेना ‘ऑपरेशन तुडवा’ सुरू करणार असल्याचा थेट इशारा संजय राऊतांनी दिला आहे.











