मुंबई : मुंबईत काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या मतदार संघातील ४ माजी नगरसेवकांनी राजीनामे दिले. वर्षा गायकवाड यांच्याकडे या पाचही माजी नगरसेवकांनी राजीनामे सोपवले आहेत. हे सर्व नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
९ऑगस्ट रोजी ऑगस्ट क्रांती दिनी मुंबई काँग्रेसने आखलेल्या कार्यक्रमाला अनुपस्थित राहणाऱ्यांना करणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर पक्षात नाराजी वाढली. त्याचा परिणाम म्हणून आता मुंबई काँग्रेसचे माजी नगरसेवक वाजिद कुरेशी (चांदिवली), बब्बू खान (धारावी), गंगा कुणाल माने (धारावी), पुष्पा कोळी (सायन)यांनी राजीनामे दिले असून, पदाधिकारी भास्कर शेट्टी यांनी देखील राजीनामा दिला आहे. वर्षा गायकवाड यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचे या माजी नगरसेवकांनी सांगितले. इतकेच नाही तर हे नगरसेवक शिंदे गटात जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. राज्यातील आगामी निवडणुकांसाठी सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरू करण्यात आली असताना, माजी नगरसेवकांच्या राजीनाम्यामुळे मुंबईत काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला आहे.