LPG Cylinder Price: आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे जगभरात 21व्या शतकातील सर्वात मोठे ऊर्जा संकट निर्माण झाले होते. या जागतिक संकटामुळे भारतात घरगुती गॅस सिलिंडरची किंमत तब्बल 2000 रुपयांपर्यंत वाढण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. मात्र, केंद्र सरकारने वेळीच घेतलेले योग्य निर्णय आणि मुत्सद्दी रणनीतीमुळे देशातील सामान्य ग्राहकांवर याचा मोठा भार पडू दिला नाही, असा मोठा खुलासा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
राजस्थानच्या बालोत्रा जिल्ह्यातील पचपदरा येथे एका भव्य रिफायनरी प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या राजनैतिक शक्तीचा योग्य वापर करून संसाधनांचे चोख नियोजन केले आणि या संकटावर यशस्वी मात केली, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
उज्ज्वला लाभार्थ्यांना ६५० रुपयांपेक्षा कमी दरात सिलिंडर; व्यावसायिक गॅसमध्येही कपात
पंतप्रधानांनी देशातील सध्याच्या गॅस दरांची माहिती देत सरकारच्या संवेदनशील कामकाजाचे कौतुक केले:
- सध्याचे दर: जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव कडाडलेले असतानाही भारतात सर्वसामान्य ग्राहकांना घरगुती एलपीजी सिलिंडर 950 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळत आहे. देशाची राजधानी दिल्लीत 14.2 किलोच्या सिलिंडरची किंमत 942 रुपये आहे.
- उज्ज्वला योजना: गरीब कुटुंबांना दिलासा देण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 300 रुपयांची थेट सबसिडी दिली जात आहे, ज्यामुळे त्यांना हा सिलिंडर केवळ 642 रुपयांना मिळत आहे.
- व्यावसायिक सिलिंडर: दोन दिवसांपूर्वीच सरकारने व्यावसायिक वापराच्या गॅस दरांमध्ये मोठी कपात करून व्यापाऱ्यांना आणि सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे. अमेरिकेसोबतच्या आंतरराष्ट्रीय तणावानंतर देशात केवळ 90 रुपयांची किरकोळ वाढ करण्यात आली होती.
युरियाचे भाव ३००० वरून ३०० रुपयांवर; शेतकऱ्यांनाही दिला मोठा दिलासा
वर्ष 2022 मधील रशिया-युक्रेन युद्धाचा दाखला देत पंतप्रधानांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात युरिया खताचे दर प्रति बॅग 3000 रुपयांच्या पार गेले होते. मात्र, सरकारने तिजोरीतून लाखो कोटी रुपयांची सबसिडी देऊन शेतकऱ्यांना केवळ 300 रुपयात युरियाची गोणी उपलब्ध करून दिली.
जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झालेली असताना भारतीय दूतावासांना विशेष जबाबदारी देऊन खतांची आयात सुरळीत ठेवण्यात आली. तसेच देशांतर्गत खत उत्पादन वाढवण्यासोबतच साठेबाजी आणि काळाबाजारावर कडक कारवाई करण्यात आली.
राजस्थानला १.०६ लाख कोटींच्या विकासकामांची भेट
या दौऱ्यात पंतप्रधानांनी राजस्थानच्या विकासासाठी 1.06 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये खालील प्रमुख प्रकल्पांचा समावेश आहे:
उडान योजना: छोट्या शहरांना आणि दुर्गम भागांना हवाई वाहतुकीने जोडण्यासाठी उडान (UDAN) योजनेच्या नवीन टप्प्याचा शुभारंभ करण्यात आला.
भव्य रिफायनरी प्रकल्प: हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) आणि राजस्थान सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 80,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून उभारलेला रिफायनरी प्रकल्प देशाला समर्पित करण्यात आला.
जोधपूर विमानतळ: जोधपूर येथे नवीन विमानतळ टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले.










