President Droupadi Murmu : काही प्रसंग आणि दृश्ये शब्दांच्या परिघापलीकडची असतात, जी थेट मानवी काळजाला भिडतात. नुकताच नवी दिल्लीतील राष्ट्रपती भवनातील भव्य ‘दरबार हॉल’ एका अत्यंत भावूक आणि हृदयस्पर्शी क्षणाचा साक्षीदार झाला. हा प्रसंग इतका संवेदनशील होता की, तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचे डोळे पाणावले. जम्मू-काश्मीरमध्ये देशाच्या रक्षणासाठी दहशतवाद्यांशी दोन हात करताना वीरमरण आलेले महाराष्ट्राचे सुपुत्र, शिपाई जंजाल प्रवीण प्रभाकर यांच्या वीरमातेने जेव्हा राष्ट्रपतींच्या हस्ते ‘कीर्ती चक्र’ हा सर्वोच्च मरणोत्तर बहुमान स्वीकारला, तेव्हा त्यांच्या डोळ्यांतील अश्रू आणि आक्रोशाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचेही हृदय हेलावून गेले.
या सोहळ्यात एका बाजूला आपल्या पुत्राने देशासाठी केलेल्या सर्वोच्च बलिदानाचा सार्थ अभिमान आणि दुसऱ्या बाजूला पोटचा गोळा गमावल्याचे असीम दु:ख, अशा तीव्र भावनांचे द्वंद्व त्या मातेच्या अंतकरणात सुरू होते. राष्ट्रपतींच्या हस्ते ‘कीर्ती चक्र’ स्वीकारताना जशी वीरमातेची नजर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नजरेशी मिळाली, तशा दोन्ही माऊली भावुक झाल्या. राष्ट्रपतींनी अत्यंत मायेने आणि आदराने त्यांना जवळ घेत धीर देण्याचा प्रयत्न केला. परंतु, राष्ट्रपतींच्या खांद्यावर डोके ठेवताच त्या वीरमातेचा संयम सुटला आणि त्यांना अश्रू अनावर झाले.
या भावनिक क्षणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पदाचा कोणताही शिष्टाचार आड येऊ न देता, देशाच्या प्रथम नागरिकाच्या मर्यादा बाजूला सारून त्या वीरमातेला घट्ट मिठी मारली. राष्ट्रपतींनी अत्यंत आत्मीयतेने त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांचे सांत्वन केले. हा केवळ शौर्य पुरस्कार वितरणाचा एक औपचारिक सोहळा उरला नव्हता, तर भारतमातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या एका शूर पुत्राच्या मातेप्रती संपूर्ण देशाने व्यक्त केलेली ती कृतज्ञता आणि सहानुभूती होती.
या शौर्याची पार्श्वभूमी ६ जुलै २०२४ च्या त्या काळरात्रीशी जोडलेली आहे. जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेले काही कुख्यात परदेशी दहशतवादी लपून बसल्याची खात्रीशीर माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे राष्ट्रीय रायफल्स (महार रेजिमेंट) आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे संपूर्ण परिसराला वेढा घातला आणि अत्यंत दुर्गम भागात शोधमोहीम सुरू केली.
या मोहिमेत शिपाई जंजाल प्रवीण प्रभाकर हे आघाडीच्या फळीवर तैनात होते. दहशतवाद्यांनी अचानक सुरू केलेल्या अंधाधुंद गोळीबाराला न डगमगता त्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. स्वतःच्या प्राणांची तसूभरही पर्वा न करता, अजोड धैर्य आणि उत्कृष्ट युद्धकौशल्याचे प्रदर्शन घडवत त्यांनी दहशतवाद्यांची नाकेबंदी तोडू दिली नाही. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत रणनीतिक चातुर्य दाखवून त्यांनी आपल्या अचूक नेमबाजीने दोन कुख्यात दहशतवाद्यांना जागीच ठार केले.
या घनघोर चकमकीदरम्यान दहशतवाद्यांनी झाडलेल्या अनेक गोळ्या शिपाई प्रवीण प्रभाकर यांच्या शरीरात घुसल्या. गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले असतानाही त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला. त्यांना तातडीने लष्करी रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान भारतमातेचे रक्षण करत या वीर पुत्राने देशासाठी आपले सर्वोच्च बलिदान दिले. त्यांच्या याच अलौकिक शौर्याला आणि बलिदानाला केंद्र सरकारने ‘कीर्ती चक्र’ प्रदान करून सन्मानित केले, ज्याने संपूर्ण देशवासियांचे डोळे अभिमानाने आणि दुःखाने ओलावले.










