Jalgaon Accident : जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक आणि भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. तालुक्यातील मंगरूळ जवळील लोंढे फाट्याजवळ एक बलेनो कार आणि मोटरसायकल (दुचाकी) यांच्यात झालेल्या अत्यंत तीव्र धडकेत तब्बल पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये दोन्ही वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अधिकच्या माहितीनुसार, अपघातातील बलेनो कार ही गुजरात राज्यातून महाराष्ट्रात येत होती. एका कौटुंबिक साखरपुड्याच्या कार्यक्रमासाठी हे वऱ्हाडी मोठ्या उत्साहाने प्रवासाला निघाले होते. मात्र, नियतीच्या मनात काहीतरी वेगळेच होते. मंगरूळ परिसरातील लोंढे फाट्याजवळ ही कार आणि समोरून येणारी दुचाकी एकमेकांना धडकली. या अपघातात साखरपुड्याच्या आनंदावर विरजण पडले असून, वऱ्हाड्यांवर काळाने भीषण घाला घातला आहे. या अपघातामुळे मंगलकार्याचे रूपांतर अत्यंत शोककुळ वातावरणात झाले आहे.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक मंगरूळ ग्रामस्थांनी अत्यंत संवेदनशीलतेने घटनास्थळाकडे धाव घेतली आणि तातडीने मदतकार्य सुरू केले. त्यानंतर अमळनेर पोलीस आणि वैद्यकीय पथकही तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती, ज्यामध्ये दोन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश होता. याच बरोबर उपचारादरम्यान आणखी एकाने दम तोडल्यामुळे या भीषण अपघातातील एकूण मृतांचा आकडा आता पाचवर पोहोचला आहे.
या अपघातात इतर दोन जण गंभीररीत्या जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या नजीकच्या एका खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. ही दुर्दैवी घटना आज सकाळी साधारण आठ वाजेच्या सुमारास घडली.










